Skip to main content

बाकरवडी ते बरीटो - भाग ८: भागलपूरचा भामटा

आमचं गंगास्वप्न पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. बंगालमधून पुण्याकडे परतणारे गट कायम रात्री १० वाजताची आझाद हिंद एक्स्प्रेस पकडून रायपूर-नागपूरमार्गे पुण्याला पोचतात. परंतु आम्हाला काहीतरी वेगळा अनुभव घेण्याची खुमखुमी असल्याने (अंगातले कीडेच म्हणू शकता) आम्ही फरक्काला गाडी पकडून बिहार, उत्तर प्रदेश मार्गे मुंबई गाठायची असं ठरवलं होतं. जेवण उरकून रेल्वे स्थानकाकडे निघणार तेव्हाच गाडी १२ तास उशिरा येणार असल्याचं समजलं. म्हणजे आता संपूर्ण रात्र त्या निर्मनुष्य स्थानकावर काढायची किंवा मालदाकडे उलट जाऊन तिथे वाट पहात बसायचं असे दोन पर्याय समोर होते. रात्री बाराच्या आसपास आम्ही पुढच्या गाडीत जनरलच्या डब्यात चढलो आणि मालदा स्थानक गाठलं.

प्रतीक्षाकक्षात वेळ काढत रात्र कशीबशी पुढे सरकली. दर काही तासांनी गाडीची चौकशी करून यायचं, 'कुछ पता नही' हेच उत्तर पुन्हा ऐकायचं, आणि कधीही आपली गाडी येईल आणि आपल्याला न घेताच निघून जाईल अशा अनावश्यक भीतीने अस्वस्थ व्हायचं हे चक्र चालूच होतं. मरणप्राय कंटाळा! अखेर दुपारी कधीतरी गाडी आली आणि अखेर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. वाट बघून दमलेले सर्व सात जीव गाडीत चढले. "आता बास आम्हाला घरी पोचवा" ही एकच भावना सर्वांच्या मनात होती.

सात वाजले असतील. एव्हाना सूर्य खाली गेला होता. मी नकाशावर ठिकाण बघत होतो. बिहारची सीमा जवळ आल्याचं पाहिल्यावर मी गटावर सन्देश पाठवला, "बिहार सुरु होतोय, सामानाची काळजी घ्या." आम्ही वेगवेगळ्या डब्यांमध्ये बसलो होतो. बिहारच्या लोकसंख्येबद्दल आम्ही बोलत होतो. बिहार आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येत फारतर एक कोटीचा फरक आहे; परंतु बिहारचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एक तृतीयांश आहे. म्हणजेचं बिहारमधील माणसांची गर्दी महाराष्ट्राच्या तिप्पट आहे. गरिबी, शिक्षण, गुन्हेगारी अशा विविध प्रश्नांवर आमची चर्चा चालू असतानाच गाडी भागलपूर स्थानकाला आली.

गाडी फलाटावर लागल्यावर डब्यात भरपूर हालचाल झाली. बाहेरही बरीच वर्दळ होती. मी खिडकीत बसलो होतो. इमर्जन्सीची लाल गजांची मोकळी ढाकळी खिडकी असते ना त्या खिडकीपाशी. एकीकडे आमची चर्चाही रंगली होती नि मधेच बाहेरही बघत होतो. माझा मोबाईल दोन खिडक्यांच्या मधे असलेल्या चार्जिंग पोइंटवर चार्ज होत होता. मोबाईल मात्र हातातच धरून ठेवला होता मी. दहा एक मिनिटं थांबून गाडी निघाली असेल इतक्यात खिडकीतून हात घालून एका भुरट्याने माझा फोन खेचून घेतला. काही कळण्याच्या आतच माझ्या हातातला फोन गायब झाला होता आणि गर्दीतून पळत जाणारी एक आकृती आम्हाला दिसत होती. पिवळा शर्ट घातलेला एक मधल्या वयाचा इसम आम्हाला स्पष्टपणे दिसत होता. मी आरडाओरडा सुरु केला; परंतु फलाटावरील कोणीच त्या चोराला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा उद्धार करेपर्यंत तो रेल्वेस्थानकाच्या भिंतीवरून उडी मारून फरार झाला होता. माझ्या ओरडण्यात एक हतबलता होती.

भागलपूर जंक्शनवरील हाच तो फलाट
एव्हाना गाडीने वेग धरला होता. प्रॉण्ड्या आणि चैत्याने साखळी खेचली पण गाडी थांबेपर्यंत फलाट निघून गेला होता. मी खिडकी उघडून खाली उडी मारली. मागोमाग चैत्यानेही उडी मारली. भिंतीच्या दिशेने आम्ही पळालो परंतु भुरटा तर केव्हाच पळून गेला होता. विशेष म्हणजे स्थानकावर पोलिस उभे होते. त्यांनी शांतपणे हा सर्व प्रकार बघितला होता. माझं डोकं त्यांना पाहिल्यावर अजूनच गरम झालं. मी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. "अब कुछ नहीं हो सकता, आप गाड़ी में बैठो" असं त्यांनी शांतपणे म्हणल्यावर तर मी फुटलोच. #IamwithKhakee अभियान चालविणाऱ्या माझ्यातल्या सौजन्यशील नागरिकाचा त्यांनी अंत पाहिला होता. आयुष्यात मी पहिल्यांदा पोलिसांचा उद्धार केला, तेही सर्व फलाटाला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात. हतबलता आणि स्वतःच्या मूर्खपणावर माझा प्रचंड संताप झाला होता. भोंगा वाजला आणि गाडी सुटली. आम्ही पुन्हा गाडीत चढलो.

आता डोक्यात होती केवळ सुन्नता. काय काय नुकसान झालं याची गिनती मनात चालू व्हायलाही काही मिनिटं गेली असावीत. एक एक करून जोडलेले एक-दोन हजार संपर्क, नोट्समधल्या अनेक छोट्यामोठ्या नोंदी, भाषणांचे काढलेले मुद्दे, स्वतःची आणि दुसऱ्यांची केलेली अनेक ध्वनिमुद्रणे, काही अलगदपणे टिपून ठेवलेल्या चारोळ्या, प्रवासात सुचलेल्या काही नाजूक कविता, आणि गेल्या अनेक महिन्यांमधले विविध दौऱ्यांमधली असंख्य हृद्य छायाचित्रं...आता सहन होईना...अरुणाचलच्या विद्यार्थ्यांनी दिलेला निरोप, मणिपूरच्या डोंगरातील प्रेमळ चेहरे, रेल्वे प्रवासातली धमाल, आणि गंगा! डोळ्यात टचकन पाणी आलं. एका क्षणात असंख्य आठवणींचा चुराडा झाल्याची भावना अस्वस्थ करणारी होती. डोकं गरगरेल इतक्या वेगाने विचार मनात फिरत होते. हतबलता आणि त्यातून येणारी अस्वस्थता. Backup घेतला नाही म्हणून आलेला संताप आणि फोनचा गैरवापर झाला तर अशी शंका.

तातडीने सर्व जण कामाला लागले. ट्वीटर वरून बिहार रेल्वे, केंद्रीय रेल्वे मंत्री अशांना संपर्क करणे, सर्व पासवर्ड रिसेट करणे, फोनचा tracker तपासणे अशी केविलवाणी धावपळ चालू होती. शेजारपाजारच्या लोकांचे उपदेश चालू होतेच. तोपर्यंत चैत्याच्या जखमेकडे कोणाचेच लक्ष गेलं नव्हतं. त्याने खिडकीतून उडी मारली तेव्हा पायाला दगड लागण्यामुळे चांगलीच जखम झाली होती. तो तसाच माझ्यामागे पळाला होता. मग मलमपट्टी झाली. पुढच्या सर्व प्रवासात कोणी पोलीस येत होते, चौकशी करत होते, उपदेश देत होते. आम्हीही तीच तीच कॅसेट पुन्हा पुन्हा वाजवत होतो. जो तो आपल्या कोर्टातला चेंडू पुढे ढकलत होता आणि मोबाईल परत मिळण्याची आशा संपत चालली होती. त्या रात्री आमच्या डब्यात अशाच प्रकारच्या तीन चोऱ्या झाल्या. उपदेश करणाऱ्या काकूंचं सर्वच चोरीला गेल्याने आता आम्हीच त्यांना चहा पाजत होतो. नियतीचा खेळ फार विचित्र असतो बुवा!

अखेर आम्ही मुंबईत उतरलो आणि पोलीस ठाणं गाठलं. तक्रार नोंदवून आपण आपलं कर्तव्य पूर्ण करायचं असं ठरवून गेलेलो असल्याने ५ तास लागले तरी आम्ही तिथून हललो नाही. पोटात फक्त एक बिस्किटचा पुडा. कडाडून भूक लागली होती. त्यावर कडी म्हणजे पोलीस खात्याचा अत्यंत गचाळ आणि उद्धट कारभार. शेवटी संध्याकाळी एका गाडीच्या जनरलच्या डब्यात चढलो आणि पुण्यात पोचलो. वीस दिवसांचा लांबलचक प्रवास पूर्ण करून अखेर आमचा दौरा संपला. बिहारमार्गे प्रवास करण्याची आमची हौस चांगलीच फिटली होती. दौऱ्याचा हेतूच असतो की आपला देश बघावा, त्यातील समाज बघावा, विविध अनुभव घ्यावेत, लोक समजावून घ्यावेत, त्यांचे प्रश्न समजावून घ्यावेत, त्यांच्याकडून चार चांगल्या गोष्टी शिकाव्यात. भागलपूरच्या भामट्याने मला चांगलाच धडा शिकवला. आता मी माझ्या फोनचा नियमितपणे back up घेतो. आणि हो, भागलपूर रेल्वे पोलिसांचे अधून मधून मला अमेरिकेत संदेश येतात तेव्हा मी त्यांच्याशी चार प्रेमाच्या गप्पा मारतो..आता तेही मजेत आहेत आणि मीही! (क्रमश:)
       
बब्बू
१६ जून २०१९
वेस्ट लाफियात, अमेरिका       

भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७
भाग ९
भाग १०

Comments

  1. गुरू,गुरू होता है!!!🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Is it all about sex?

Shocked by the title? Or maybe excited? Maybe you are thinking that I have gone crazy to talk about 'this' thing. Maybe, you will be disappointed with what I am going to write. In any case, since you are already here, do read till the end. Read because this is a true story about someone's private life and not-so-private life. In October 2014, I met a person with a beautiful voice. She sang a melodious Kannada bhajan. I and my friends sat around her to listen to her story, a story that was unheard of, a story which was not even close to our realities. She narrated 'her' story..a story of a transgender! Akkai is her name today but she was born as Jagadish. ...I was born as a male child, a child with male private parts. Born into an upper caste family and father serving in the Air Force, it was herculean to come out to them. My brother had married a Christian girl and was excommunicated. Then sister married a Dalit boy and was excommunicated too. At the tender ag...

दुसरीच्या गणिताचं कोडं

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) संख्या वाचन आणि लेखनाची नवीन पद्धत आणली आहे. त्यावर सामाजिक माध्यमातून बरीच चर्चा झाली हे चांगलं झालं. या निमित्ताने शिक्षणासारखा महत्वाचा विषय चर्चेत आला. याबद्दल थोडक्यात... १. एकवीस , बावीस..च्या जोडीने वीस एक , वीस दोन ही पद्धत पुस्तकात आणली आहे. ही निश्चितच तुलनेने सोपी आहे याची कारणे शिक्षणशास्त्राच्या नजरेतून पुढीलप्रमाणे -   १.१ ' दशक आणि एकक पद्धतीमध्ये १० एकक एकत्र करून दशक होतो आणि त्यात पुढे एकक जोडत गेले की मोठ्या संख्या तयार होतात ' ही मांडणी प्राथमिक इयत्तांमधली पुस्तकांमध्ये मांडली जाते. यातील दशक-एकक क्रम महत्वाचा आहे. Concrete to abstract या pedagogical तत्त्वाला अनुसरून दहा एककांची मोळी तयार करणे अशा क्रियांना महत्व दिले गेले आहे. हा बदल 2005 च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरणापासून जास्त स्पष्टपणे मांडला आहे. संख्या वाचनाचा नवीन बदल हा त्याच धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. म्हणून हा बदल गणित अध्यापनाच्या दृष्टीने शास्त्रीय ठरतो .  १.२ 'दशकाकडून एककाकडे'  हा  क्रम...

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...