Skip to main content

Posts

Showing posts with the label Travel

पन्नाच्या पानांमधून - भाग २: जंगल वाचताना

 Welcome, Sir! हसऱ्या चेहऱ्यानं आमचं राणीपूर गावात स्वागत झालं. दुपारचे चार वाजले होते. आमच्या गाडीची वाट पहाट ६ स्थानिक तरुण-तरुणी रस्त्याच्या कडेला उभे होते. जंगल सफारी तर पुढच्या दिवशीपासून सुरू होणार होती. मग इथं नेमकं काय बघायला आलोय याची उत्सुकता लागली होती. "Walk with the Pardhis" अशा नावाचा कार्यक्रम इथे होणार होता इतकंच माहीत होतं.  पारधी समाज हा पारंपारिक दृष्ट्या शिकारीवर अवलंबून असलेला भटका समाज. इतर समाजाने काहीसा वाळीत टाकलेला, गुन्हेगार ठरवून टाकलेला समाज. गावात कोणताही गुन्हा घडला की पहिले पारधी वस्तीवर अटक होणार हे आपल्या समाजातलं करूण वास्तव. "ज्याच्या हाती ससा तो पारधी" अशी म्हणच जिथे रुळली आहे तिथे पारध्याच्या नशिबी "आधी अटक मग चौकशी" हाच न्याय येणार. त्यात नवल ते काय! 😢 आपण आता जंगल कसं बघायचं हे शिकणार आहोत, बीरेन दादाने सांगितलं. आम्ही त्यांच्या पाठोपाठ चालायला सुरूवात केली. "हे आवळ्याचं झाड," "हे खैराचं झाड. पानात कथ्था लावतात ना ते हेच," असं सांगत सांगत त्यांनी आम्हाला एका खड्ड्यापाशी थांबवलं. "हे बघा, हे ...

पन्नाच्या पानांमधून - भाग १: वरद, मला जंगल दाखव ना

वरद, मला जंगल दाखव ना… डिसेंबरच्या सुरुवातीला मी वरदकडे जंगल बघण्याची इच्छा बोलून दाखवली. वरद माझ्याहून ८-९ वर्षं लहान पण माझा जुना मित्र. अत्यंत हुशार आणि स्वतंत्र विचारांचा! शाळेपासूनच त्याने छायाचित्रकला शिकली; जंगलं भटकायला सुरूवात केली. आता जैवविविधता विषयात मास्टर्स करता करता Footloose Journeys सोबत naturalist म्हणून काम करतो. तातडीनं त्यानं तारखा काढल्या; वेळापत्रक बसवलं; आणि आमचा "जंगल बघायला जाण्याचा" पहिलाच धाडसी "पारिवारिक" कार्यक्रम सुरू झाला!   पुणे-मुंबई प्रवासात कुठेतरी… आपण पन्नाला जाऊया, वरदने सुचवलं. पन्ना म्हणजे मध्य प्रदेश मधलं एक अत्यंत सुंदर जंगल. झाशी पासून ४ तासांवर आणि खजुराहोच्या मंदिरांपासून अगदी वीस किलोमीटरवर. विंध्य पर्वतरांगांमध्ये कर्णावती नदीच्या काठाने वसलेलं साधारण १००० वर्ग किलोमीटरचं समृद्ध जंगल! समृद्ध अशासाठी की नदी, डोंगर, आणि पठार अशा तिन्ही प्रकारच्या landscape ने नटलेला भूप्रदेश फार थोडक्या जंगलांना लाभला आहे; पन्ना त्यापैकीच एक.  तेवीस डिसेंबरला पुणं सोडलं. अनेकच वर्षांनी घरच्यांसोबत रेल्वेचा प्रवास करताना मुंबईत वडापाव खा...

ज्ञा पु, ही चिटिंग आहे..

प्रिय ज्ञा पु, सप्रेम नमस्कार! आज तुम्हाला हे पत्र लिहिताना मनात खूप अस्वस्थता आहे. वेळ जणू काही मंदावला आहे. आज दिवसभर सतत मनात तुमच्या आठवणींनी काहूर माजलं होतं. आजवर तुमच्याशी बोलताना कधीच संकोच वाटला नाही, पण आज हे पत्र लिहिताना मात्र शब्द अडकतायेत. मागच्या महिन्यात आपण तुमच्या वाढदिवसाला बोललो. किती उत्स्फूर्तपणे तुम्ही "धन्यवाद बंधू आकाश" अशी साद घातली होतीत. कसं जमायचं तुम्हाला असं कोणालाही आपलंसं करून टाकायला? मेच्या शेवटच्या आठवड्यात तर आपण शिबिराला भेटलो. एका मेसेजवर तुम्ही शिबिरात विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला तयार झालात. स्व-रूपवर्धिनी सारख्या मोठ्या संस्थेचे कार्यवाह असूनही तुम्ही एका मेसेजवर "हो" म्हणलात. तुम्हाला एका साध्या फोनचीही अपेक्षा नाही वाटली? कुठून येतो हा साधेपणा? कसं जमतं अशा सर्व जगाला व्यापून उरलेल्या अहंचा त्याग करणं? तुमचा प्रतिसादही मला लाजवणारा होता. तुम्ही उत्तरात लिहिलंत, "अरे जरूर आकाश. आप सिर्फ आज्ञा करो. बंदा हाजीर. 😄" अहो ज्ञा पु, कोण असं इतकं स्वतःवर हक्क गाजवून घेतं? मी तुमच्याहून २० वर्षांनी लहान. तुमच्या कार्य कर्...

बाकरवडी ते बरीटो - भाग १०: बरीटोशी गट्टी

ठाण्याच्या अलीकडे गाड्यांची ही प्रचंड गर्दी. विमानतळावर जाण्यापूर्वी ठाण्याच्या मामाला भेटायचं आणि मग रवाना व्हायचं, असं ठरलं होतं. पण ही गर्दी बघता विमान चुकतंय का काय अशी भीती वाटायला लागली होती. त्यातच शेजारच्या धसमुसळ्या चालकाने आमची गाडी घासली आणि आरश्याचा चुराडा झाला. गाडीतला ताण हळूहळू वाढत चालला होता...अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती...त्यातही वातावरण हलकंफुलकं ठेवण्याचे प्रयत्न आईकडून चालूच होते! ठाण्याला पोचलो तेव्हा घराच्या बाहेरच पवईचा अनुप भेटला. अनेक तास वाट बघून कंटाळला होता बिचारा. खरगपूरहून रत्नदीप येऊ शकणार नव्हता. अनुप, रत्नदीप, सौरभ, पुष्कर म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षातले सर्वात जवळचे साथीदार. त्यांनी मिळून एक भेटवस्तू आणली होती. ती देण्यासाठी रात्रीच्या अपप्रहारी अनुप ठाण्याच्या अनोळखी गल्लीत वाट बघत उभा होता. मामाचा निरोप घेऊन विमानतळावर पोचलो. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचा तो रुबाबच अजब! अनेक मित्रांनी माझ्याआधी यापूर्वी तिथून जड निरोप घेतला होता. त्या सर्वांच्या मनात भावनांची काय गर्दी त्या क्षणी झाली असेल याचा अनुभव मी घेत होतो. भव्य कमानींच्या प्रवे...

बाकरवडी ते बरीटो - भाग ८: भागलपूरचा भामटा

आमचं गंगास्वप्न पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. बंगालमधून पुण्याकडे परतणारे गट कायम रात्री १० वाजताची आझाद हिंद एक्स्प्रेस पकडून रायपूर-नागपूरमार्गे पुण्याला पोचतात. परंतु आम्हाला काहीतरी वेगळा अनुभव घेण्याची खुमखुमी असल्याने (अंगातले कीडेच म्हणू शकता) आम्ही फरक्काला गाडी पकडून बिहार, उत्तर प्रदेश मार्गे मुंबई गाठायची असं ठरवलं होतं. जेवण उरकून रेल्वे स्थानकाकडे निघणार तेव्हाच गाडी १२ तास उशिरा येणार असल्याचं समजलं. म्हणजे आता संपूर्ण रात्र त्या निर्मनुष्य स्थानकावर काढायची किंवा मालदाकडे उलट जाऊन तिथे वाट पहात बसायचं असे दोन पर्याय समोर होते. रात्री बाराच्या आसपास आम्ही पुढच्या गाडीत जनरलच्या डब्यात चढलो आणि मालदा स्थानक गाठलं. प्रतीक्षाकक्षात वेळ काढत रात्र कशीबशी पुढे सरकली. दर काही तासांनी गाडीची चौकशी करून यायचं, 'कुछ पता नही' हेच उत्तर पुन्हा ऐकायचं, आणि कधीही आपली गाडी येईल आणि आपल्याला न घेताच निघून जाईल अशा अनावश्यक भीतीने अस्वस्थ व्हायचं हे चक्र चालूच होतं. मरणप्राय कंटाळा! अखेर दुपारी कधीतरी गाडी आली आणि अखेर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. वाट बघून दमलेल...

बाकरवडी ते बरीटो - भाग ७: जैसे बरसों में कोई गंगा नहाए

६ जून २०१८. मणिपूरच्या डोंगरांमधून बाहेर पडलो तेव्हा ४ दिवसांनी मोबाईलला रेंज मिळाली. गटाचा निरोप घेऊन एकट्यानेच परतीचा प्रवास सुरु केला. पुढचा मुक्काम नागालँडच्या दिमापूरला होता. इथल्या छात्रावासात १३ वर्षांपूर्वी राहिल्याच्या उत्कट आठवणी सोबत होत्या. तेव्हा दिमापूरमध्ये पावसाने चांगलाच झोडपून काढला होता आम्हाला. रेल्वे स्थानकावर स्थानिक गुंडांनी दिलेली दहशत अजूनही मनात ताजी होती. दिमापूर म्हणजे घटोत्कचाचे शहर. इथल्या राजबाडीतील दगडी प्यादे म्हणजे घटोत्कच आणि भीमाचा बुद्धिबळाचा पट होता म्हणे! त्या दिमापूरात मला आज एक महत्वाचं काम उरकायचं होतं - व्हिसाचा अर्ज. हो, एकीकडे निवांत भारतभ्रमण चालू असताना मी अजूनही व्हिसाचा अर्ज केला नव्हता. अमेरिकेची स्वप्नं काही अजूनही पडत नव्हती आणि व्हिसा म्हणजे तर शेवटचा प्रहार होता. तिथून माघार नव्हती. मग आज करू, उद्या करू, म्हणून टाळंटाळ चालली होती. पण आता अर्ज केला नाही तर तारीख मिळूनही वेळेत व्हिसा हातात येणार नाही हे लक्षात आल्यावर हे काम दिमापूरमध्ये पूर्ण करायचं असं  ठरवूनच मणिपूर सोडलं होतं. गावभर फिरून शबनमचं मोठं खोकं खरे...