Skip to main content

बाकरवडी ते बरीटो - भाग ५: ब्रह्मपुत्रेचे प्रेमपत्र

आज मी थोडा मागे जाणार आहे. पर्ड्यू कि कोलंबिया या द्वंद्वाचा निकाल लागेना तेव्हा 'परत आल्यावर बघू' असे म्हणून मी अरुणाचलला निघून गेलो. निर्णय काहीही झाला तरी अमेरिकेला जाण्यापूर्वी अरुणाचलचा हा शेवटचा दौरा ठरणार अशी मनात धाकधूक होती. गेल्या ३ वर्षांत मी अरुणाचलचे ७ दौरे केले होते. तिथल्या मुलांसाठी प्रज्ञा विकास कार्यक्रम राबवत असताना त्या निसर्गभूमीशी खूप जवळचे नाते जडले होते. विशालकाय ब्रह्मपुत्र, रोइंगची नितळ देवपानी नदी, झिरोचे ते खुणावणारे डोंगर, मिचमिच्या डोळ्यांची लाजरीबुजरी पोरं, त्यांचं ते विशेष हिंदीतून बोलणं, आपल्यावर जीवापाड प्रेम करणं आणि कधीच ते व्यक्त न करता येणं हे सगळं माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेलं होतं. हे सगळं मागे सोडून यायचं या कल्पनेनीच मला कसंतरी होत होतं. गुवाहाटी रेल्वे स्थानकावरून सोनलताई, मृण्मयी, स्वरूपाचा निरोप घेताना सगळं एकदम भरून आलं आणि तिथेच स्पष्ट झालं होतं की आपलं काही खरं नाही.

अरुणाचलच्या सुदूर पूर्वेला रोइंग नावाचे शहर आहे. भारताच्या सीमावर्ती भागातल्या विवेकानंद केंद्राच्या ७ शाळांचे विद्यार्थी तिथे वर्षातून ३ वेळा शिबिरांसाठी जमतात. एव्हाना रोइंग हे माझं दुसरं घर झालं होतं. शिबिरात पोचल्या पोचल्या माझी नजर ओंजी मिहूला शोधत होती. मिचमिच्या तरतरीत डोळ्यांचा गायक 'ओंजी'! तितक्यात विनोदकुमार 'रायन कीचे' गळ्यात येऊन पडला. जेवून चालायला सुरुवात करताच ओंजी आला. कडकडून गळाभेट झाली. जुन्या-नव्या गड्यांसोबत शिबीर सुरु झाले. डोंगराळ भागातील खेड्यापाड्यांमध्ये असणाऱ्या बुद्धिमत्तेला आकार देण्याचे प्रामाणिक प्रयत्न आम्ही विवेक इन्स्पायर या प्रकल्पातून करतो आहोत. निसर्गाने उभ्या केलेल्या खडतर प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ या मुलांच्या पंखात उभं करण्याचं आव्हान आम्ही घेतलंय. तीन वर्षांत त्याची मुळे रुजली आहेत. अजून बरेच काम व्हायचे आहे. अपुरे शिक्षकी बळ, आर्थिक अडचणी, वाहून जाणारे रस्ते, जगाशी संपर्काचे मर्यादित मार्ग, जगाने ठोकलेला 'मागास' हा शिक्का..एक ना अनेक आव्हाने. पण आमचा जिंकण्याचा निर्धार त्याहून प्रबळ ठरणार, हे आम्हाला माहित आहे.

गावलिया ग्यांगस्टर
विविध साहित्य प्रकारांची ओळख, स्पर्धापरीक्षांची कौशल्ये, संगीत, पाककला, कल्पक काम अशा विविध विषयांचा मुक्त संचार मुलांनी या शिबिरात केला. एकेक दिवस पुढे सरकत होता तसतसे मुलांना माझ्या परदेशी प्रवेशाची बातमी सांगणे अवघड होत जात होते. आमच्या दोघांसाठीही ते पचवणं सोपं नव्हतं. शेवटी, पाचव्या दिवशी संध्याकाळच्या खेळानंतर मी मुलांना गोलात बसवले. जोरदार फुटबालचा खेळ झाला होता. सूर्य डोंगराआड कधीच गेला होता. भरभर अंधार पडत होता. मी मन गोळा करून मुलांना बातमी सांगितली. क्षणात शांतता पसरली. सर्वांनी मैदानात माना खुपसल्या. कोणीच वर बघेना. मग मीच शांतता मोडली.
I want to see you all rise so high that I feel extremely proud of everyone here.
वाक्य संपेपर्यंत गालावरून अश्रू खाली वाहले होते. मी पटकन डोळे पुसले. अंधाराच्या पदरामागे लपून अश्रू पुसण्याचे आमच्या दोघांचेही केविलवाणे प्रयत्न सर्वांनीच टिपले होते. भयाण शांतता. एकेकाने मैदान सोडले.

थोड्यावेळाने जीनवांग आणि ग्यामन खोलीवर आले. थोड्यावेळाने निएलसो आणि दोनी आले. त्या गप्पा संपाव्या असं कोणालाच वाटत नव्हतं. रात्री आठवीच्या पोरांना खोलीवर बोलवून घेतले होते. तोपर्यंत मुलींपर्यंत बातमी पोचली होती. तोंड पाडूनच त्या आल्या. मी सर्वांशी आयुष्यात समोर मोठे ध्येय ठेवण्याबद्दल बोललो. त्यावर मुलांचे लेखन चालू होते तोपर्यंत प्रत्येकाला एकेक पत्र लिहिलं, अगदी मनापासून! उद्या शिबीराचा शेवटचा दिवस आणि परवा मुलांचा परतीचा प्रवास.

पहाटेच उठून देवपानी नदीवर जाऊन आलो. येताना नित्यनियमाने मृण्मयीसाठी पात्रातून रंगीत दगड उचलले. गेली ३ वर्षं आम्ही दोघांनी एकत्रपणे हा कार्यक्रम राबवला होता. या तीन वर्षांनी माझं आयुष्य खूप समृद्ध केलं. मुलांना शिकवण्याचं अत्युच्च समाधान मला इथे मिळालं. Ph.D.करण्याची प्रेरणा मला इथेच मिळाली. ग्रामीण भारतातल्या खाणीत दडलेले हिरे घडवण्यासाठी प्रयत्न करायचे ही उमेद इथेच मिळाली. निरागस, निर्व्याज प्रेम इथे मिळालं. जगण्याकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी मला या डोंगराळ, बोजड प्रदेशात मिळाली. त्याचं ऋण कसं आणि कुठे फेडणार...
विवेक इन्स्पायर : रोइंग (मार्च २०१८)
५ वाजले. शिबिराच्या समारोप सत्राची आम्ही तयारी केली. चुकूनही भावनिक भाषण न करता दहा मिनिटांच्या आत खाली बसायचे असं मी स्वतःसाठी ठरवलं होतं. पहिल्यांदा आज स्वतःला कडक बंधन घालून उभा राहिलो होतो. १२५ करोड भारतातील किमान २ ते ३ करोड प्रज्ञावंत विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात. त्यांच्या प्रगतीतून आणि कष्टातून नवा भारत उभा राहील, असे सांगून मी खाली बसलो. शिबीर संपले. आता शेवटची रात्र. पहाटेपासून एकेका शाळेतील मुलं आपापल्या गावांकडे परत फिरणार.

जेवण झाले तसे सगळे मैदानात जमले. शेकोटी पेटवली गेली. खास खीर बनली होती. शुभ चांदण्याच्या प्रकाशात, विस्तीर्ण मैदानाच्या एका बाजूला आगीभोवती गोल करून मुलं-मुली असा भेंड्यांचा सामना सुरु होणार होता. वीज नव्हतीच. अचानक आठवीच्या मुलींनी 'कभी अलविदा ना कहना' गाण्याने सुरुवात केली. एकदम माझी धडधड वाढली. आम्ही भरपूर गाणी म्हणली. तासाभराने शेकोटी संपली पण मुली परत जायचं नाव काढेनात. त्यांना रात्रभर गप्पा मारायच्या होत्या. पहाटे ३.३० ला भेटू असे समजावून त्यांना कसेबसे पाठवले. मुलांचे छात्रावास समोरच असल्याने ती थांबलेली. रस्त्यातच ठाण मांडून बसल्यावर पर्यायच उरला नाही. मलाही खोलीवर जायचे नव्हतेच. अर्धा एक तास झाला असेल इतक्यात प्रीयेंसो मला बोलवायला आला. काही मुलं खोलीबाहेर वाट बघत उभी होती. मी लगेच तिकडे गेलो.

कीर्र अंधारात माझ्या खोलीबाहेर ७ मुलं शांतपणे उभी होती - 'गावलिया ग्यांगस्टर' हे त्यांनी स्वतःलाच दिलेलं नाव. कधीही शांत न बसणारी, सर्वात मस्तीखोर टोळी. मी जाऊन बोलायला सुरुवात केली तसं विजेरीच्या प्रकाशात टोनासोच्या हातात काहीतरी चमकलं. रंगीत कागदात बांधलेली भेटवस्तू होती ती. दिवसभरात कधीतरी आमचा डोळा चुकवून मुलं बाहेर जाऊन आली होती. सर्वांनी खिशातले खाऊचे १०-२० रुपये टाकून माझ्यासाठी खास कॉफीमग आणला होता. उघडल्यावर त्यातून काही चॉकलेटं आणि एक छोटं पत्र निघालं. पुन्हा डोळे पाणावले. त्या अंधारात आम्ही एक सेल्फी काढला. इतकं निखळ प्रेम भरून घ्यायला माझी झोळीच मला दुबळी वाटायला लागली होती. तुफान पाऊस सुरु झाला तसे सगळे पांगले. तुफान पाऊस..बाहेरून आणि आतून..मला चिंब भिजवत होता.

क्षण निरोपाचा : सुनपुरा शाळेच्या मुली
पहाटे साडे चारलाच दरवाज्यावर थाप पडली. मुली सगळं सामान आवरून गप्पा मारायला हजर झाल्या होत्या. थोड्यावेळाने मुलंही जमली. सकाळीच मेहफिल सजली. हळूहळू एकेका शाळेची मुलं निघायाची. रस्त्यापर्यंत जाऊन सर्वांना निरोप द्यायचे. गळाभेटी घ्यायच्या. पुन्हा डोळे ओलावणार, पुन्हा हळूच टिपायचे. खेळ चालूच. दरम्यान स्थानिक मुलांपैकी सागर गुरुंग आणि अभिराम येऊन भेटवस्तू देऊन गेले. शेवटी उरल्या फक्त सुनपुरा शाळेच्या मुली. अचानक वातावरण बदलले. डावखुरी रिबिना, गुंड एम्था, खळीवाली ओयीसिरी हमसून हमसून रडायला लागल्या. मी शांतपणे बघत होतो. जुई त्यांना शांत करायचा प्रयत्न करत होती. त्या सर्वांनी रात्रीत एक नाच बसवला होता. त्यांनी तो करून दाखवला. माझ्याकडे काहीच शब्द उरले नव्हते. एक प्रकारचा मंदपणा आला होता. एव्हाना अकरा वाजले होते. म्हणजे हा निरोपाचा कार्यक्रम तब्बल साडे ६ तास चालू होता. मी मुलींना परत पाठवले.

आम्ही आवरून बाहेर पडलो. इबा मेयोच्या बाबांच्या गाडीतून रोइंग फिरलो. इबा म्हणजे संत माणूस. चेहऱ्यावर मंद हास्य पण तोंडातून चकार शब्द नाही. काही स्थानिक भेटीगाठी करून रात्री मुख्याध्यापक कृष्णन सरांकडे जेवण करायला गेलो. त्यांनीही विशेष सामिष बेत केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हीही निघणार होतो. साडे आठची गाडी होती. धावत पळत इबा मेयो पुन्हा हजर! त्याच्या हातात दोन भेटवस्तू होत्या. एकात स्थानिक आदिवासी जमातीचा सुंदर पिवळा-काळा कंठलंगोट होता तर दुसऱ्यात अरुणाचलच्या नकाशाची प्रिंट. मी खाली बसून इबाला कडकडून मिठी मारली. सामान उचलले आणि दरवाज्यातून पुन्हा एकदा मागे वळून शाळेचा निरोप घेतला.

गाडी सुटली. एक मोठा श्वास घेतला. डोळे घट्ट मिटून घेतले. जितके क्षण साठवता येतील तितके साठवून मी ब्रह्मपुत्र ओलांडली, लवकर परत येण्याचे पक्के आश्वासन देऊन! तिचे ते अथांग पात्र मला निरोप देणार नव्हतेच याची खात्री होती मला.. ब्रह्मपुत्र कधीच निरोप देत नाही..ती फक्त प्रेमपत्र पाठवते. आणि, तुम्हाला जावंच लागतं..निमुटपणे..विनातक्रार..कारण..त्या प्रेमामध्ये सर्वांना नि:शब्द करण्याची अफाट शक्ती असते..ते प्रेमपत्र म्हणजे आदेशच असतो एक..तो शिरसावंद्य मानायचा आणि आकंठ प्रेमात नाहून घ्यायचे (क्रमश:)

बब्बू
२१.१०.२०१८
वेस्ट लाफियात, अमेरिका
 
भाग १
भाग २
भाग ३

भाग ४
भाग ६
भाग ७
भाग ८
भाग ९
भाग १०

Comments

  1. ब्रह्मपुत्र कधीच निरोप देत नाही..ती फक्त प्रेमपत्र पाठवते. अगदी खरं.
    गावलिया ग्यांगस्टर! Eiba! खूप छान लिहिलंयस दादा. थेट भिडलं!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ऋषी... अनुभवच आपण असे सारखे घेतलेत म्हणून भिडले असेल..

      Delete
  2. मी इथल्या इथे पुण्यामध्ये वाघोली आणि आसपास च्या ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धंपरीक्षांचे मार्गदर्शन करतो आहे. जोरदार क्षमता असलेली पण आत्मविश्वास कमी असणारी मुलं माझ्या आसपास भरपूर आहेत.

    तुझ्या कामाचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे. त्यातून अजून काम करण्याचे मोटिव्हेशन मिळत राहते. म्हणून लिहीत राहा आमच्या कामाला त्यातून वेग आणि प्रेरणा मिळत राहील.

    पुढच्या भागाची वाट पाहतोय.
    All the Best.

    ReplyDelete
    Replies
    1. स्वागत.. धन्यवाद! तू खूप महत्त्वाचे काम करतो आहेस. आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपली ग्रामीण भागातली मुलं सुद्धा कुठेही कमी नाहीत.. तुख्या कामाला सलाम आणि शुभेच्छा.. मला सविस्तरपणे तुझं काम ऐकायला आवडेल..

      Delete
  3. Amazing... Arunachal is like if you give a bit, you will get back a bagfull. They are just amazing people..I have spent 9 years with them...

    ReplyDelete
    Replies
    1. Absolutely true.. they love you unconditionally.. we have a lot to learn from them

      Delete
  4. आई ग...अमेरिकेत बसून अरुणाचल बद्दल लिहिलेस आणि पुण्यात रडवलेस ��

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ताई..हे अनुभवच असे आहेत की कुठल्याही हृदय असलेल्या माणसाला दोन क्षण थांबण्याचा मोह होणारच

      Delete
  5. आकाश, तुझे समृद्ध अनुभव नेमक्या शब्दात मांडलेस! खूप छान वाटलं वाचून!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद धनंजय! तुझ्याकडेही अनेक समृद्ध अनुभव आहेत आणि आता अधिकारी म्हणून काम करताना तर अनेक प्रसंग येतील. तुझेही लेखन वाचायला आवडेल मला. :)

      Delete
  6. दादा, अंर्तमुख केलंस. माझ्या आगामी दौ-यांसाठी तुझा हा अनुभव नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.����

    ReplyDelete
  7. दादा, अंतर्मुख केलस. तुझा एक एक शब्द माझ्या पुढच्या दौ-यांसाठी प्रेरणा देणारा ठरेल.🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Is it all about sex?

Shocked by the title? Or maybe excited? Maybe you are thinking that I have gone crazy to talk about 'this' thing. Maybe, you will be disappointed with what I am going to write. In any case, since you are already here, do read till the end. Read because this is a true story about someone's private life and not-so-private life. In October 2014, I met a person with a beautiful voice. She sang a melodious Kannada bhajan. I and my friends sat around her to listen to her story, a story that was unheard of, a story which was not even close to our realities. She narrated 'her' story..a story of a transgender! Akkai is her name today but she was born as Jagadish. ...I was born as a male child, a child with male private parts. Born into an upper caste family and father serving in the Air Force, it was herculean to come out to them. My brother had married a Christian girl and was excommunicated. Then sister married a Dalit boy and was excommunicated too. At the tender ag...

दुसरीच्या गणिताचं कोडं

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) संख्या वाचन आणि लेखनाची नवीन पद्धत आणली आहे. त्यावर सामाजिक माध्यमातून बरीच चर्चा झाली हे चांगलं झालं. या निमित्ताने शिक्षणासारखा महत्वाचा विषय चर्चेत आला. याबद्दल थोडक्यात... १. एकवीस , बावीस..च्या जोडीने वीस एक , वीस दोन ही पद्धत पुस्तकात आणली आहे. ही निश्चितच तुलनेने सोपी आहे याची कारणे शिक्षणशास्त्राच्या नजरेतून पुढीलप्रमाणे -   १.१ ' दशक आणि एकक पद्धतीमध्ये १० एकक एकत्र करून दशक होतो आणि त्यात पुढे एकक जोडत गेले की मोठ्या संख्या तयार होतात ' ही मांडणी प्राथमिक इयत्तांमधली पुस्तकांमध्ये मांडली जाते. यातील दशक-एकक क्रम महत्वाचा आहे. Concrete to abstract या pedagogical तत्त्वाला अनुसरून दहा एककांची मोळी तयार करणे अशा क्रियांना महत्व दिले गेले आहे. हा बदल 2005 च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरणापासून जास्त स्पष्टपणे मांडला आहे. संख्या वाचनाचा नवीन बदल हा त्याच धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. म्हणून हा बदल गणित अध्यापनाच्या दृष्टीने शास्त्रीय ठरतो .  १.२ 'दशकाकडून एककाकडे'  हा  क्रम...

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...