Skip to main content

बाकरवडी ते बरीटो - भाग ७: जैसे बरसों में कोई गंगा नहाए

६ जून २०१८. मणिपूरच्या डोंगरांमधून बाहेर पडलो तेव्हा ४ दिवसांनी मोबाईलला रेंज मिळाली. गटाचा निरोप घेऊन एकट्यानेच परतीचा प्रवास सुरु केला. पुढचा मुक्काम नागालँडच्या दिमापूरला होता. इथल्या छात्रावासात १३ वर्षांपूर्वी राहिल्याच्या उत्कट आठवणी सोबत होत्या. तेव्हा दिमापूरमध्ये पावसाने चांगलाच झोडपून काढला होता आम्हाला. रेल्वे स्थानकावर स्थानिक गुंडांनी दिलेली दहशत अजूनही मनात ताजी होती. दिमापूर म्हणजे घटोत्कचाचे शहर. इथल्या राजबाडीतील दगडी प्यादे म्हणजे घटोत्कच आणि भीमाचा बुद्धिबळाचा पट होता म्हणे! त्या दिमापूरात मला आज एक महत्वाचं काम उरकायचं होतं - व्हिसाचा अर्ज.

हो, एकीकडे निवांत भारतभ्रमण चालू असताना मी अजूनही व्हिसाचा अर्ज केला नव्हता. अमेरिकेची स्वप्नं काही अजूनही पडत नव्हती आणि व्हिसा म्हणजे तर शेवटचा प्रहार होता. तिथून माघार नव्हती. मग आज करू, उद्या करू, म्हणून टाळंटाळ चालली होती. पण आता अर्ज केला नाही तर तारीख मिळूनही वेळेत व्हिसा हातात येणार नाही हे लक्षात आल्यावर हे काम दिमापूरमध्ये पूर्ण करायचं असं  ठरवूनच मणिपूर सोडलं होतं. गावभर फिरून शबनमचं मोठं खोकं खरेदी करून झाल्यावर रात्री अर्ज भरायला घेतला. विजेचा लपंडाव चालला होता. इंटरनेट मरणासन्न अवस्थेत जेमतेम चालत होतं. रात्री १२ च्या आसपास पाऊस पडायला लागला. जुना अनुभव ताजा असल्याने आता पाऊस झोडपणार हे माहित होतं. इंटरनेटचा मृत्यू अटळ होता. झालंही तसंच. डोंगलने प्राण सोडले आणि मी शेवटी पुण्यात विनयला फोन केला. रात्रभर मी आणि विनयने एकत्र अर्ज भरला - म्हणजे त्याने एक एक प्रश्न वाचायला आणि मी उत्तर डिक्टेट करायचे. मग त्याने एकेक अक्षर वाचून दाखवायचे आणि मी स्पेलिंग्स तपासायची - असा खेळ अनेक तास चालू होता. शेवटी चार वाजता विनय झोपायला गेला आणि मी पुढचं काम सुरु ठेवलं. एव्हाना पाऊस थांबला होता आणि डोंगल बाबा पुन्हा जिवंत झाले होते. दिमापूरच्या साक्षीने अखेर व्हिसा प्रकरण पुढे सरकले. मुलाखतीची तारीख मिळाली - जुलै अखेरची - म्हणजे, अमेरिकेला जायच्या तारखेच्या अगदी तोंडावर. असो!

दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात मी दलावरच्या दुसऱ्या गटाला सिलिगुडीत भेटणार होतो. पुढचे पाच दिवस आम्ही बंगालचा निमुळता 'चिकन्स नेक' प्रदेश पालथा घालणार होतो. नक्षलबाडी मार्गे आम्ही नेपाळमध्ये जाऊन आलो. नक्सलबाडीत माओ आणि स्टॅलिनच्या पुतळ्यांना लाल सलाम ठोकून संघाच्या शाळेमध्ये भारतमातेस वंदन करून आलो. बंगालमध्ये परस्पर विरोधी विचार सरणीचे लोक एका ठिकाणी हमखास एकत्र भेटतात. किंबहुना एकामुळेच दुसऱ्याला अस्तित्व असते. आपण दोघांनाही समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा!

पुढे बिहारच्या सीमेलगत असलेल्या दालखोला नगरीत एका स्थानिक कम्युनिस्ट नेत्याकडे पाहुणचार घेतला. ममता दीदीच्या दीदीगिरीचे अनेक 'पराक्रम' त्यांच्याकडून ऐकायला मिळाले. 'बंगालमधले डावे संपले, आता ममता दीदींना पर्याय फक्त भाजप' या बोलण्यातला त्यांचा संमिश्र खेद आणि धूसर आशा आम्हाला समजत होती. पुढच्या वाटेवर बांगलादेश सीमेवरचे कालीयागंज गाव गाठले. वनवासी कल्याण आश्रमाच्या छत्रछायेत एक रात्र मुक्काम केला. सीमेवरच्या गावांमधली बकाल परिस्थिती पाहिली. वैज्ञानिक दृष्टीचा अभाव, धर्माच्या नावाखाली कट्टरवादी विचारांचा प्रभाव पाहिला. मनाला भयानक उदासी आली. दोन गावांमध्ये वैज्ञानिक प्रयोगांमधून जादूचे प्रयोग दाखवले आणि पोरं  खुश! बांग्लादेश सीमेवरही जाऊन आलो. आता प्रतीक्षा होती फराक्केची...

Source - Internet
फराक्का...२००५ ला पहिल्यांदा फराक्का हे नाव ऐकलं होतं. बंगभूमीतील एक नितांत महत्वाचं ठिकाण. उत्तर भारताची जीवनवाहिनी असलेली गंगा नदी भारतातला आपला प्रवास संपवून बांग्लादेशात जाण्याच्या वाटेवर अवघ्या १७ किलोमीटर अलीकडे हे फराक्का शहर आहे. हिमालयापासून ते उत्तर प्रदेश, बिहार, आणि बंगालमधील पाणी पोटात सामावून तृप्त झालेली गंगा फराक्का शहरातून बांग्लादेशाकडे जाताना मागे वळून आपला निरोप घेत असल्याचा भास मला फराक्केत कायम होतो. रेल्वेतून प्रवास करताना कायम फराक्का आलं की दरवाज्यात जाऊन बसायचं आणि त्या अचाट गंगेकडे डोळे भरून पाहायचं हा नित्यनियमाचा कार्यक्रम. ११० दरवाजांच्या त्या अफाट ब्यारेजवरून खडखडाट करत जाण्याऱ्या रेल्वेच्या पार्श्वसंगीतावर ती गंगामाई आपल्याशी बोलते आहे, आपले गर्वहरण करते आहे, असा भास मला होतो. तिच्या त्या विश्वरूप दर्शनासमोर हात नकळत जोडले जातात. आणि मागे उरते ती फक्त शून्य शांतता आणि आगगाडीचा रुळांशी चालू असलेला लोचट खेळ.

फराक्काकडे बसने प्रवास सुरु झाला. वाटेत कालियाचाक शहर लागलं - माफिया आणि तस्करीच्या कुख्यात घटनांमुळे गाजलेलं आणि आपले छिनाल खेळ लपवण्यासाठी धार्मिक दंगलींचा आधार घेऊन पोलीस स्टेशन जाळलेलं कुख्यात शहर. रस्त्यावरच्या प्रचंड गर्दीत त्या भरगच्च बसने प्रवास करताना गुदमरल्यासारखं सारखं झालं होतं. बाहेरून उडून आत येणाऱ्या त्या धूळकट मातीने केसाचा झाडू झाला होता. घामामुळे सगळाच एकदम चिकचिकाट झाला होता. गंगेची आतुरता अजूनच वाढली होती.

तेवढ्यात लांबवर पाणी दिसायला लागलं. गंगा! अद्भुत गंगा! अफाट गंगा! पुन्हा तेच ११० दरवाजे आणि ती शून्य शांतता. गाडीतून उतरलो आणि तडक गंगेचा किनारा गाठला. संध्याकाळची सहाची वेळ. सूर्य घाईने त्या गंगेत बुडी घेण्याच्या तयारीत होता. कधीतरी लहानपणी प्रयागला गंगा-यमुना संगमात डुबकी घेतली होती. तेव्हापासून प्रतीक्षा होती, या गंगेत पुन्हा एकदा सामावून जायचं, तिच्या भव्यतेसमोर नतमस्तक व्हायचं, तिच्या आणि आपल्यातलं अद्वैत अनुभवायचं! ते स्वप्न आता अवघ्या काही फुटांवर उभं होतं.

आम्ही लगबगीने पाण्यात उतरलो. बंगाल दौऱ्यातले आम्ही सगळे मागच्या वर्षी ओडिशाचा दौरा एकत्र केला होता. आता या दौऱ्यानंतर अमेरिका वारी ठरलेली होती. आपल्या सगळ्यात लाडक्या (आणि निव्वळ टारगट) मित्रांसोबतचा दौऱ्यातला तो शेवटचा क्षण अगदी समोर येऊन उभा होता. माझ्या मनात विचारांचा आणि भावनांचा कल्लोळ चालू होता. बिड्या, कुंड्या, ख्रिस्तोफर, एल्बी, प्रॉन्ड्या, चैत्या, आणि मी. मागे फराक्केचा ब्यारेज, अस्ताला जाणारा सवित्रसूर्यनारायण आणि नजर जाईल तिथपर्यंत दिसणारी ती विस्तीर्ण गंगा! पाण्यातल्या आणि मनातल्या दंग्याची जागा आता शांततेनी घेतली. आम्ही गोलात उभे राहिलो...एकमेकांचे हात हातात धरले...आणि उपासनेचे शांत स्वर त्या नादभरल्या वातावरणात, गंगेच्या जलाशयात अलगद सामावून गेले. (क्रमशः)

बब्बू
२८ मार्च २०१९
वेस्ट लाफियात, अमेरिका

Source - Internet
भाग २
भाग ३
भाग ४

Comments

  1. Kamaal bachha shabdat takad aahe.... Ganga aahech adbhut pan tuzya varnanane Tichya bhetichi odh vadhali baghu kafhi maze nav pukarate te!! Surekh !!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Is it all about sex?

Shocked by the title? Or maybe excited? Maybe you are thinking that I have gone crazy to talk about 'this' thing. Maybe, you will be disappointed with what I am going to write. In any case, since you are already here, do read till the end. Read because this is a true story about someone's private life and not-so-private life. In October 2014, I met a person with a beautiful voice. She sang a melodious Kannada bhajan. I and my friends sat around her to listen to her story, a story that was unheard of, a story which was not even close to our realities. She narrated 'her' story..a story of a transgender! Akkai is her name today but she was born as Jagadish. ...I was born as a male child, a child with male private parts. Born into an upper caste family and father serving in the Air Force, it was herculean to come out to them. My brother had married a Christian girl and was excommunicated. Then sister married a Dalit boy and was excommunicated too. At the tender ag...

दुसरीच्या गणिताचं कोडं

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) संख्या वाचन आणि लेखनाची नवीन पद्धत आणली आहे. त्यावर सामाजिक माध्यमातून बरीच चर्चा झाली हे चांगलं झालं. या निमित्ताने शिक्षणासारखा महत्वाचा विषय चर्चेत आला. याबद्दल थोडक्यात... १. एकवीस , बावीस..च्या जोडीने वीस एक , वीस दोन ही पद्धत पुस्तकात आणली आहे. ही निश्चितच तुलनेने सोपी आहे याची कारणे शिक्षणशास्त्राच्या नजरेतून पुढीलप्रमाणे -   १.१ ' दशक आणि एकक पद्धतीमध्ये १० एकक एकत्र करून दशक होतो आणि त्यात पुढे एकक जोडत गेले की मोठ्या संख्या तयार होतात ' ही मांडणी प्राथमिक इयत्तांमधली पुस्तकांमध्ये मांडली जाते. यातील दशक-एकक क्रम महत्वाचा आहे. Concrete to abstract या pedagogical तत्त्वाला अनुसरून दहा एककांची मोळी तयार करणे अशा क्रियांना महत्व दिले गेले आहे. हा बदल 2005 च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरणापासून जास्त स्पष्टपणे मांडला आहे. संख्या वाचनाचा नवीन बदल हा त्याच धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. म्हणून हा बदल गणित अध्यापनाच्या दृष्टीने शास्त्रीय ठरतो .  १.२ 'दशकाकडून एककाकडे'  हा  क्रम...

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...