Skip to main content

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय!

अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्यापकांमधून त्यातल्या त्यात तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करणारे ३-४ महाभाग बाजूला काढा, त्यांचे काम पुन्हा पुन्हा वाचून नोट्स काढा, त्यांच्या संशोधनाची माहिती घ्या, त्यापैकी अगदीच भारावून टाकलेल्या एखाद्याला पत्र पाठवा आणि मग नवीन विद्यापीठ बघून पुन्हा हीच सगळी प्रक्रिया करा. विद्यापीठांच्या भल्या मोठ्या यादीतून तुमच्या स्वतःच्या लायकीचे वास्तववादी अवलोकन करून, त्यात आशावादाचे थोडे औषध टाकून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा धीर टिकेपर्यंत हे काम चालू ठेवायचे. या वास्तववादी अवलोकनात आपला जीआरी परीक्षेतला पराक्रम, टोफेलची (म्हणजे, खिशाला भोक पाडणारी एक अतिशय निरुपयोगी परीक्षा) कामगिरी, गुणपत्रिकेवरून दिसणारे आपले महाविद्यालयीन प्रताप आणि आपल्या व्यावसायिक कामाचा तुटपुंजा अनुभव इतकं सगळं समाविष्ट असतं. त्यात भर पडते ती आपल्या तज्ञ मित्रांच्या सल्ल्यांची. बरं, एखाद्याला नक्की माहिती असेल कि त्याला पुढे का शिकायचं आहे, कुठे शिकायचं आहे, काय शिकायचं आहे तर बापडा फेसबुकवर वगैरे वेगवेगळे ग्रुप्स जॉईन करून मस्त पुढे जातो. पण ज्याला मुळातच 'शिकायचं आहेच का' किंवा 'शिकायचंच आहे का' असे प्रश्न दर सातव्या मिनिटाला पडत असतील त्या पामराने या सगळ्या प्रक्रियेतून जाताना गांगरून गेल्यास नवल ते काय!

बर, हे इतकंच असतं ना तरी माझी काही म्हणजे काही हरकत नव्हती. मनाला मारून मुटकून कामाला लावता येण्याचा अनुभव होता माझ्याकडे. केवळ मी अभियांत्रिकी शिकलोय म्हणून नाही तर मी त्यानंतर पुढे दोन वर्ष जॉबही केलाय म्हणून. पण जीआरी, टोफेल सोडून अजून ५-६ गोष्टी जुळवून आणल्याशिवाय अर्ज पूर्ण होत नाही. एक, म्हणजे तुमचे परिचयपत्र, म्हणजे रेसुमे. भारतसोडून जगभरात सगळीकडे तुम्ही या कागदावर लिहिलेल्या गोष्टी शंभर टक्के खऱ्या मानल्या जातात त्यामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी असते. पुढे त्यांनी प्रवेश दिल्यावर इज्जत काढून घेणे फारसे चांगले दिसत नाही म्हणून जरा नैतिक ताण येतो. दोन, उद्देशपत्र, म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पस. या कागदावर आपल्याला याच विद्यापीठात का जायचे आहे हे रेटून लिहायचे असते. आधी काढलेल्या नोट्सच्या आधाराने फर्डेदार इंग्रजीमध्ये, जीआरीमधले आर्ड्यूअस वगैरे शब्द कोंबून हा निबंध लिहायचा. आपल्या अ आणि द च्या चुकांमुळे ते पल्लेदार शब्द झाकोळले जात असणार हे नक्की माहित असून सुद्धा मोठ्या मोठ्या विद्यापीठांना तोऱ्यात पत्रं लिहायची. आत्मविश्वास महत्वाचा! या पत्राच्या निमित्ताने अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे स्वतःचे प्रचंड कौतुक करता येण्याची कला शिकून घेणे. म्हणजे, उदाहरणार्थ - आपण कॉलेजच्या टिनपाट सोशल क्लबमध्ये चारच बैठकीला गेलो असू तरीसुद्धा बाबा आमटेंच्या तोडीचे काम केले असल्याचा निर्वाळा देता यायला हवा. काही ठिकाणी ही आत्मस्तुती वेगळ्या कागदावर लिहून मागवतात आणि त्यालाच पर्सनल स्टेटमेंट असेही म्हणतात.

सौजन्य: www.mymovierack.com

हे जमले तर तिसरे फार अवघड नाही, फक्त थोडा धीर धरला पाहिजे. पुणे विद्यापीठातून आपल्या ट्रान्सक्रिप्ट मिळवणे. म्हणजे बघा, अर्ज केल्यानंतर २-३ महिन्यांनी विद्यापीठाच्या एका अतिशय मलूल इमारतीत जाऊन अनेक गठ्ठ्यांमधून आपणच आपला अर्ज शोधून त्यांना द्यायचा आणि काही तास थांबून त्या कागदावरचा मजकूर दुसऱ्या कागदावर छापून घेऊन त्यावर सील घ्यायचे. सोपं आहे ना एकदम? फक्त (माझ्यासारखे) शेवटच्या क्षणी जागे झालात तर थोडी ओळख पाहिजे.

चौथे काम मात्र तुमच्या पूर्वपुण्याईवर अवलंबून आहे. आपल्या आधीच्या तीन शिक्षकांकडून शिफारसपत्र मिळवणे. आता आधी जर दिवे लावले असतील तर अवघडे जरा पण शिक्षकांशी बरं नातं जपलं असेल तर होतात तयार शिक्षक. म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी एकदाच तयार करून ठेवलेला मसूदा असतो. त्यात फक्त नाव बदलून घ्यायचं. (आता हे हार्वर्ड, कोलंबिया वगैरेंना कळत नसेल का! कमाल आहे.) या प्रक्रियेत एक छोटी मेख आहे. हे पत्र आपल्याला न दाखवता थेट विद्यापीठाला त्या शिक्षकांनी स्वतंत्रपणे पाठवायचे असते. आपल्याला फक्त आपल्याच शिक्षकांचा पाठपुरावा करावा लागतो, तेही मनात कोणतीही अपराधीपणाची भावना न आणता. हे जमले कि झाले. मी फार नशीबवान. माझ्या तीनही शिक्षकांनी (ज्यातले एक ज्ञान प्रबोधिनीचे संचालक आहेत) स्वतः पत्र तयार केले आणि मी आठवण न करता प्रत्येक विद्यापीठाला आपापले पाठवून दिले. लेकीन, हर किसीको नही मिलती इतनी खुशकिस्मत जिंदगी, इन्शाअल्लाह!

पाचवे, काही विद्यापीठांना तुमच्या लेखनाचे नमुने वाचायचे असतात आणि तुमच्या निवडीत त्याचा मोठा वाटा असतो. बहुतेक सर्व मोठ्या विद्यापीठांना ही आवश्यकता पूर्ण करणे गरजेचे असते. हे आधी काही चांगले लिहिले असेल तर ठीक. शेवटच्या क्षणी काहीही (चांगले) लिहिणे शक्य नाही. खात्रीलायक सांगतो. सहावे आणि शेवटचे काम, अर्ज भरणे. प्रत्येक विद्यापीठाचा स्वतंत्र अर्ज भरताना सामान्य मानवी मनाची दमछाक होणे स्वाभाविक आहे. १०-१५ पानी अर्ज, विविध आकडेवारी, गुण, कागदपत्रं, प्रश्नोत्तरं पूर्ण करून शेवटच्या पानावर आलो कि तिथे भरायची असते फी. ७५ ते १२० डॉलर्स म्हणजे ५००० ते ८००० रुपये फी भरली कि तुमचा अर्ज पूर्ण होतो. त्या विद्यापीठाला तुमचे जीआरी आणि टोफेल्चे गुण पाठवायचे ४७ डॉलर्स म्हणजे ३००० रुपये वेगळेच. असे सगळे करून, वेळेच्या आत तुम्ही अर्ज पाठवून दिले कि नाताळ होऊन अमेरिकी मंडळी पुन्हा कामावर रुजू होईपर्यंत तुम्ही बोंबलत फिरायला मोकळे. उगीच आकड्यांचा होशोब करू नका. लाख दोन लाखाचा बांबू नक्कीच बसतो. 

हे सगळं करायचं हे ठरलेलं असलं तरीसुद्धा कधी करायचं हेही ठरवणे गरजेचे असते. म्हणजे बघा, प्रबोधिनीतून रात्री ११-१२ला घरी येऊन whatsapp, फेसबुक पाहून, जेवण आणि घरच्या शिव्या खाऊन झाल्यावर पहाटे ६-७ पर्यंत जागायचं आणि सकाळच्या शाळेला जाणारी आपली आई घरातून बाहेर पडताना आयतं हातात मिळालेलं दूध पिऊन पांघरूण घेऊन दुपारपर्यंत ताणून द्यायची. वर वर्णन केलेलं आपलं सगळं काम शेवटच्या तारखेच्या आधी पूर्ण होईल या विश्वासाने पुन्हा नवीन दुपार सुरु करायची आणि रात्री ११-१२च्या आधी काही केल्या घरी यायचं नाही. मग कसं होणार? नाही म्हणजे, आत्मविश्वास असायला हरकत नाही..पण इतका फाजील आत्मविश्वास?! म्हणूनच हे सगळं पूर्ण केल्यावर नक्की वाटतं, "अपुनही भगवान है!" (क्रमश:)

बब्बू
२७.०९.२०१८
वेस्ट लाफियात, अमेरिका

भाग १
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७
भाग ८
भाग ९
भाग १०

Comments

  1. बब्बू.. छान चालू आहे लिखाण, आवडलं, चालू राहू दे. तुम लिखाते रहो, हम वाचते रहेंगे :)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Very interesting I loved It👍👍🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Is it all about sex?

Shocked by the title? Or maybe excited? Maybe you are thinking that I have gone crazy to talk about 'this' thing. Maybe, you will be disappointed with what I am going to write. In any case, since you are already here, do read till the end. Read because this is a true story about someone's private life and not-so-private life. In October 2014, I met a person with a beautiful voice. She sang a melodious Kannada bhajan. I and my friends sat around her to listen to her story, a story that was unheard of, a story which was not even close to our realities. She narrated 'her' story..a story of a transgender! Akkai is her name today but she was born as Jagadish. ...I was born as a male child, a child with male private parts. Born into an upper caste family and father serving in the Air Force, it was herculean to come out to them. My brother had married a Christian girl and was excommunicated. Then sister married a Dalit boy and was excommunicated too. At the tender ag...

दुसरीच्या गणिताचं कोडं

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) संख्या वाचन आणि लेखनाची नवीन पद्धत आणली आहे. त्यावर सामाजिक माध्यमातून बरीच चर्चा झाली हे चांगलं झालं. या निमित्ताने शिक्षणासारखा महत्वाचा विषय चर्चेत आला. याबद्दल थोडक्यात... १. एकवीस , बावीस..च्या जोडीने वीस एक , वीस दोन ही पद्धत पुस्तकात आणली आहे. ही निश्चितच तुलनेने सोपी आहे याची कारणे शिक्षणशास्त्राच्या नजरेतून पुढीलप्रमाणे -   १.१ ' दशक आणि एकक पद्धतीमध्ये १० एकक एकत्र करून दशक होतो आणि त्यात पुढे एकक जोडत गेले की मोठ्या संख्या तयार होतात ' ही मांडणी प्राथमिक इयत्तांमधली पुस्तकांमध्ये मांडली जाते. यातील दशक-एकक क्रम महत्वाचा आहे. Concrete to abstract या pedagogical तत्त्वाला अनुसरून दहा एककांची मोळी तयार करणे अशा क्रियांना महत्व दिले गेले आहे. हा बदल 2005 च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरणापासून जास्त स्पष्टपणे मांडला आहे. संख्या वाचनाचा नवीन बदल हा त्याच धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. म्हणून हा बदल गणित अध्यापनाच्या दृष्टीने शास्त्रीय ठरतो .  १.२ 'दशकाकडून एककाकडे'  हा  क्रम...