ठाण्याच्या अलीकडे गाड्यांची ही प्रचंड गर्दी. विमानतळावर जाण्यापूर्वी ठाण्याच्या मामाला भेटायचं आणि मग रवाना व्हायचं, असं ठरलं होतं. पण ही गर्दी बघता विमान चुकतंय का काय अशी भीती वाटायला लागली होती. त्यातच शेजारच्या धसमुसळ्या चालकाने आमची गाडी घासली आणि आरश्याचा चुराडा झाला. गाडीतला ताण हळूहळू वाढत चालला होता...अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती...त्यातही वातावरण हलकंफुलकं ठेवण्याचे प्रयत्न आईकडून चालूच होते! ठाण्याला पोचलो तेव्हा घराच्या बाहेरच पवईचा अनुप भेटला. अनेक तास वाट बघून कंटाळला होता बिचारा. खरगपूरहून रत्नदीप येऊ शकणार नव्हता. अनुप, रत्नदीप, सौरभ, पुष्कर म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षातले सर्वात जवळचे साथीदार. त्यांनी मिळून एक भेटवस्तू आणली होती. ती देण्यासाठी रात्रीच्या अपप्रहारी अनुप ठाण्याच्या अनोळखी गल्लीत वाट बघत उभा होता. मामाचा निरोप घेऊन विमानतळावर पोचलो. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचा तो रुबाबच अजब! अनेक मित्रांनी माझ्याआधी यापूर्वी तिथून जड निरोप घेतला होता. त्या सर्वांच्या मनात भावनांची काय गर्दी त्या क्षणी झाली असेल याचा अनुभव मी घेत होतो. भव्य कमानींच्या प्रवे...